आपल्याच व्यक्ती विरोधात नाराजी व्यक्त केली तर विरोधकांना स्थानिक पातळीवर बळ मिळेल.! आ. सुहास कांदे
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव ( नाशिक ) संतोष कांदे
माझी लायकी नसताना या मनमाड शहराने मला आमदार केले.त्यातून उतराई होण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मग त्यात करंजवन पाणी योजना असेल, औद्योगिक वसाहत असेल, सामाजिक अस्मिता जोपसण्यासाठी महापुरुषांचे पुतळे असेल. एक ना अशा अनेक लोककल्याणकारी योजना या शहरासाठी राबवल्या आहेत. व अजूनही प्रयत्न सुरु आहेत. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
शहरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा उस्मानिया रिसॉर्ट वर घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र देशमुख होते. तर व्यासपीठावर शाईनाथ गिडगे,फरहान खान,मयूर बोरसे, गंगादादा त्रिभुवन, राजाभाऊ आहिरे, अल्ताफबाबा खान, महेंद्र शिरसाठ, बबलू पाटील, सुनील हांडगे, दिलीप नरवडे, पंकज खताळ, रवींद्र घोडेस्वार, आदी उपस्थित होते.
बोलताना आ. श्री. कांदे पुढे म्हणाले की,भारती ताई विरोधात अनेक प्रश्नांवरून आपली नाराजी आहे. याची मला जाणीव आहे. मात्र नाराजी जाहीर करण्याची ही वेळ नाहीये. कारण या नाराजीचा फायदा आपल्या स्थानिक पातळीवर विरोधकांना होण्याचा धोका मोठा आहे, विरोधकांना प्रबळ होऊ द्यायचे नसेल तर भारती ताईंना मदत करा. तुमचे रेल्वे गाड्यासंदर्भातले सर्व प्रश्न मी उपमुख्यमंत्री ना. फडणवीस साहेबांकडून मार्गी लावून देईल. असा शब्द देतो.मनमाड करंजवन पाणी योजनेचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक घरातल्या नळाला पाणी येईल.असे ही ते म्हणाले.
विरोधी पक्षाचा खासदार तुम्ही निवडून दिला. अन पंतप्रधान मोदी साहेब झाले तर तो लोकप्रतिनिधी तुमचा कोणता प्रश्न मार्गी लावू शकेल.? असा सवाल करत मी हात जोडून विनंती करतो की,मागील सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून भारती ताई पवार यांना मदत करा.आपण मनमाड शहराला वाहतुकीच्या समस्यातून मुक्त करण्यासाठी बायपास व रिंगरोड बनवू असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी मयूर बोरसे, नाना शिंदे, राजाभाऊ भाबड, पी. आर. निळे, सचिन शिरुड, सचिन दराडे, गंगादादा त्रिभुवन, शाईनाथ गिडगे, अल्ताफबाबा खान, माजी आ. राजेंद्र देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी, उबाठा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे आमदार सुहास कांदे यांनी भगवी शाल देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर बोरसे यांनी केले तर सूत्रसंचालन बापू वाघ यांनी केले.याप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment